साहित्य स्पंदन आयोजित...
लेख स्पर्धा...
*'तृतीय क्रमांक प्राप्त लेख'*
*'पर्यावरण आणि मानव'*
मानवाच्या उत्क्रांती काळापासून म्हणजे उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यापासून मानव उत्क्रांती होत होत ते थेट आजच्या माणसापर्यंत मानवाच्या उत्क्रांती व विकासासाठी पर्यावरणाची आवश्यकता भासलेली आहे. नव्हे तर पर्यावरण हे अभिन्न अंग राहिलेले आहे. थोडक्यात काय तर अनादी काळापासून ते आजपावेतो पर्यावरण व मानव हे एकमेकांना राहिलेले आहे व कायम असणार आहे.
आपल्या अवतीभवतीचा पूर्वाश्रमीचा नितांतसुंदर परीसर व नटलेला निसर्ग जो आज मानवाने ओरबाडून काढला आहे. यालाच आपण पर्यावरण म्हणतो. हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, कीटक, जंगल, डोंगर, शेती, नदी-नाले, गवत, समुद्र आणि मानव या सर्वांचे मिळून तयार होते ते पर्यावरण होय. थोडक्यात मानवाच्या भोवतालचा व मानवाच्या जगण्यात मोलाचा हातभार लावणारा सजीवांना सुर्य, पाणी, जमीन आणि हवा अशा विविध उपयुक्त घटकांनी युक्त असलेला परीसर म्हणजे पर्यावरण होय.
मानवी जीवनच नव्हे तर सबंध सजीव सृष्टी साठी पर्यावरणचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पर्यावरणामूळेच सजीव सृष्टीचे चक्र अव्याहत चालू आहे. सुर्य, हवा, पाणी, व जमीन हे पर्यावरणाचे मुख्य घटक माणल्या गेलेले आहेत. आणि आज आपण सहज जरी विचार केला तर मानव व अन्य जीवसृष्टीसाठी या घटकांपैकी प्रत्येक घटकाचे महत्त्व खुप आहे. किंबहुना या घटका पैकी एकही घटक नसेल तर काय होईल याची कल्पना न केलेली बरी. कारण मानव व पर्यावरणाचे घटक यांचा मेळच असा घालण्यात आलेला आहे की पृथ्वीवरंच हे सृष्टीचक्र अतिशय संतुलित फिरत राहवयास हवे आणि आपण बघतो की कोट्यावधी वर्षापासून हे चक्र सुरळीत फिरत आहेत. थोडक्यात पर्यावरणाचे महत्त्व किती आहे हे आपणास कळून येते.
मानवाने आपल्या स्वतःच्या भौतिक सुखासाठी, विज्ञानाच्या नवनवीन शोधांच्या नावाखाली व स्वतःच्या स्वार्थापोटी पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास केला व करणे चालूच आहे. मानवी जीवन व पर्यावरण हे एकमेकांना पूरक आहे. एकमेकावर अवलंबुन आहे. आणि म्हणूनच 'जसे घेतले तसे दिले पाहिजे' या तत्त्वाचा माणसाला जणू विसरच पडला आहे. व तो केवळ पर्यावरणाला ओरबाडून काढत आहेत. पर्यावरणाकडू आपण काही घेऊ तसे त्यातून निर्माण होणारी कमतरता भरुन काढण्यासाठी मानवाने काही तरी दिले पाहिजे परंतु दुर्दैवाने असे होतांना दिसून येते नाही.
मानवाने पर्यावरणाचा केलेला ऱ्हास याचे परिणाम आज खुद्द मानव भोगत आहे. व पुढे असेच चालत राहिले तर या परिणामाची व्याप्ती केवढी भीषण असेल याचा विचार व कल्पना नाही केलेली बरी. भारतात आज घडीला पाण्याच्या विविध स्त्रोतांचा विचार केला तर मानवास उपयुक्त जलसाठा वर्षभर राहू शकतो परंतु उन्हाळ्यात आज पाण्याचे संकट एवढे रौद्ररूप धारण करते की, कित्येक वर्षांपासून येथे अवर्षण झाले असे वाटते. औद्योगिकरणाच्या नावाखाली आज हवा व जमीन या घटकांचा ही मोठा ऱ्हास होतो आहे. शेतातील भरघोस उत्पादनाच्या नावाखाली रासायनिक खते व किटकनाशकाचा मारा करून जमिनीची पोत निकृष्ट करीत आहोत. खरेतर आपण पर्यावरणाचा नाश म्हणजे पर्यायाने आपलाच विनाश करत आहे.
आज पर्यावरण ऱ्हासाची तीव्रता, परिणाम याची मानवाला कल्पना यायला लागली व 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. असो तरीही अजून पर्यावरणाचे ज्या पद्धतीने संवर्धन करणे आवश्यक आहे तसे दिसून येते नाही. खर म्हणजे पृथ्वीवरील सर्व चराचर सृष्टीचा आधार हे पर्यावरण आहे. पृथ्वीशिवाय अन्यत्र पर्यावरण नाही. आणि म्हणूनच पर्यावरण ही मानवाला मिळालेली महान देणगी आहे. व त्याचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.
अशा प्रकारे पर्यावरणाला मानवी जीवनात व सजीव सृष्टीत एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. हे ओळखून आपण मानवी कल्याणासाठी, नव्हे आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी या पर्यावरणाचे करुया व आपले व आपल्या नंतरच्या येणाऱ्या पिढीचे जीवन सुखकर करुया.
✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050