Friday, May 5, 2017

साहित्य स्पंदन आयोजित...
कामगार दिनानिमित्त लेख स्पर्धा...

*'उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त लेख'*


*'जीवनात श्रमाचे महत्त्व'*


समाजामध्ये आज श्रमिक कामे व अश्रमिक कामे याची तुलना होताना दिसून येते. आज श्रमिक कामापेक्षा एखाद्या कार्यालयातील टेबल वरचे काम हे श्रेष्ठ तर जे कष्टाचे काम हे हीन दर्जाचे काम असा समाजाने करुन घेतलेला गैरसमज सर्वत्र बघावयास मिळतो.
परंतु श्रमिक कामे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे किंबहुना श्रेष्ठ आहे. असे म्हटले तरी ते वावगे ठरु नये. विविध कार्यालयातील बाबू व साहेब बसल्या जागी काम करतात, परंतु आपल्याला हा विचार करावा लागेल की, जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात श्रमाचे (कष्टाचे) काम करुन अन्नधान्य पिकवलेच नाहीत तर काय होईल याची कल्पना न केलेली बरी. आणि म्हणूनच श्रम हे खुपच महत्वाचे आहे.
म्हणतात ना..... *'जिथे राबती हात तेथे हरी'*

*'श्रमातून सृजनता निर्माण होते'* म्हणजे माणूस श्रमातूनच नवीन गोष्ट निर्माण करु शकतो. जसे शेतकरी मातीतून धान्य निर्माण करतो. कामगार हा आपल्या कार्यशाळेत (कारखाना) वेगवेगळ्या लोकोपयोगी वस्तूंची निर्मिती करतो व आपल्या गरजा भागवतो. केवळ एखाद्या टेबलावर बसून खर्डेघाशी करुन हे होऊ शकत नाही.
तसेच आज समाजात ज्या थोर व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत त्यांची आत्मचरित्रे किंवा चरित्रे वाचल्यास आपणास हेच दिसून येत की, जे थोर व्यक्ती झाले ते केवळ त्यांनी जिवंतपणी घेतलेल्या अपार कष्टामूळेच. आणि मग असे असले तर श्रमिक कामे ही दुय्यम दर्जाची असतात असे कसे म्हणता येईल. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की कोणतेही काम हे कमी दर्जाचे नसते.
खरे तर जीवनात श्रमाशिवाय (कष्टाशिवाय) पर्याय नाही. नव्हे *'श्रम हाच माणसाचा खरा दागिना आहे'*. असे मला वाटते. श्रम केल्याने माणूस हा खऱ्या अर्थाने समाधानी, सुखी व निरोगी राहतो. आणि त्यामुळेच *'सत्यमेव जयते'* या वचनाइतकेच *'श्रममेव जयते'* हे ही वचन सत्य आहे.

आणि म्हणूनच.....

*देरे हरी खाटल्यावरी,*
*यासी अर्थ नसे काही ||*
*जीवनात आज तरी,*
*श्रमाशिवाय पर्याय नाही ||*


✒अनिल लांडगे उंडणगाव
ता.सिल्लोड,जि.औरंगाबाद
968 967 5050
http://anillandgeundangaonkar.blogspot.com

No comments:

Post a Comment